अलिकडच्या काळात मी फार कमी कविता लिहिल्या. उगाचच खूप वेळ विचार करावा लागतो. ब-याचवेळा कवितेत सामावलेलं दुःख अनुभवायला नको वाटतं. आज एक कविता लिहिली आहे. खिडकीतून पाहताना ढगांनी अच्छादलेले डोंगर फारच सुंदर दिसत आहेत. अंगाला जाणवणारी ही मस्त थंडगार हवा कदाचीत तिथूनच येत असावी.
कोणी म्हटलं,‘छान झालं’
काहिंनी,‘व्हायला नको होतं’
‘असं माझ्याबरोबर होईल,
मला वाटलं नव्हतं.’
आई रोज करते प्रार्थना
ती म्हणते,
‘देव सगळं चांगलं करेल’
जीवन नाही सोपं
या इथं
अनंत प्रकाशवर्षातून
माझ्या पृथ्वीवर
अगणित प्रार्थना, अनंत ईच्छा
खिडकी, आंगण, पावसातून
आज आणि चिरकाल
मन, हृदय, आत्म्यातून
जीवन व्यक्त होतं
मनोविश्वातून
नितांत सुंदर जादूई
स्वप्न पाहिलेलं
विश्वासातून
अगणित प्रार्थना, अनंत ईच्छा
आज आणि चिरकाल
**********************
कविता आणखी थोडी हवी होती, असं मला वाटतं. पण सध्यातरी डोकं चालवायची ईच्छा नाहिये. ‘मनात राहिलं मन एक’ पुस्तक प्रकाशीत होऊन या ‘अक्षय्यतृतीयेला’ एक वर्ष झालं. पण माझी सध्याची कविता लिहायची गती पाहून वाटतं दुस-या कवितासंग्रहाला वेळ लागेल.
आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा!!! :-)
रोहन जगताप कडून...
